ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज ..                      रान (wood) … एक दोन अक्षरी शब्द ! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात . मन पाखरू ...

थोडं थांबायला हवं..

...रानफुलांच्या वाटेवर..!

                हे स्पर्धेचे युग आहे आणि आपण धावायला हवं ! थांबला तो संपला ! असं म्हणून आपण धावत असतो. रात्रंदिवस. पण कधी तरी, कुठेतरी आपण थांबायला हवं. आपल्या समाधानासाठी. सुखासाठी. हे सुख कुठे मिळेल? हे समाधान कुठे मिळेल? निसर्गात! चराचरात! अगदी रस्त्याच्या कडेला, Haighway च्या कडेलाही मिळेल! 
थोडं रस्त्याच्या कडेला थांबा तुम्हाला विविध रानफुले दिसतील. आजूबाजूच्या झुडूपांना आपल्या बाहुपाशात घेऊन त्यांच्या आधारे वाढणाऱ्या व सुंदर फुलांनी बहरलेल्या प्रभातवेली (morning glory) दिसतील. त्यांचे सौंदर्य अनुभवा. तुम्हाला नक्कीच एका स्वर्गीय सुखाचा अनुभव होईल. आता मी हे तुम्हाला का सांगतोय? कारण असा अनुभव मी नेहमी घेतो. 
            
    औरंगाबाद-नाशिक हायवेवर येवला व विंचूरच्या दरम्यान एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला पांढऱ्या शुभ्र फुलांची प्रभातवेली (morning glory) असंच आपलं लक्ष वेधून घेते. तिला टाळून पुढे जाणं कुणाही निसर्गप्रेमीस अशक्यच! खूपच  सुंदर दिसते ही वेली! मी जेव्हा जेव्हा तेथून जातो तेव्हा तेव्हा तेथे थांबून वाऱ्यावर डोलणारी ती शुभ्र, चांदणी सारखी फुले न्याहाळत असतो. फुलाचा आकार अगदी कागदावर पंचकोन काढल्यासारखा. मध्यभागी चांदणी आणि त्या चांदणीच्या कोंदणात जणू जांभळ्या रंगाचा पाचू जडलाय! पाहताच त्यांची छबी मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह होतो...कितीही क्लिक करा. समाधान होत नाही. किती भारी अनुभव असतो तो! स्वतःला क्षणभर विसरण्याचा! आपण ज्याला सुख-समाधान म्हणतो ते यापेक्षा वेगळे असते का? या प्रश्नाचे उत्तर मी आपणांवर सोपवितो. रस्त्याने जातांना थोडं थांबायला शिका म्हणजे माझं म्हणणं नक्की पटेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा