ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज ..                      रान (wood) … एक दोन अक्षरी शब्द ! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात . मन पाखरू ...

किल्ले रतनगड

प्रवरेच्या उगमस्थानी 

Lockdown च्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 15 जानेवारी रोजी मित्रांबरोबर घरातून बाहेर पडलो. कुठे जायचे? अंजनेरी, मुल्हेर, रतनगड? शेवटच्याक्षणी रतनगडावर शिक्कामोर्तब झाले आणि निघालो. १२० कि.मी. चा प्रवास! ३ मोटारसायकल, ६ स्वार! सूर्योदयापूर्वी प्रवास सुरु झाला. 
                अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे धरतीवरील स्वर्गच जणू! निसर्गसौंदर्याचा असा काही वरदहस्त येथील भूमीस लाभला आहे की, स्तिमित व्हायला होते. एकदा तुम्ही या भूमीवर पाय ठेवला की पुन्हा घरी जाऊच नये असे वाटते. पावसाळ्यात तर या स्वर्गीय भूमीचे सौंदर्य कल्पनातीत असते. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर धो-धो कोसळणारा पाऊस, ते खळखळून वाहणारे झरे, बेलगाम कोसळणारे धबधबे सारं काही मंत्रमुग्ध करणारं! गिरिप्रेमींना नेहमीच खुणावणारे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथेच आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड आणि विश्रामगडासारखे इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे किल्ले या भूमीत आहेत. अमृतेश्वर-हरिश्चंद्रेश्वरासारखी प्राचीन शिवलये या भूमीत आहेत. अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले प्रवरा (अमृतवाहिणी) नदीवरील भंडारदरा धरण येथेच आहे.  अशा या निसर्गसंपन्न अकोले तालुक्यातील रतनगड हा एक किल्ला आहे.
दुरूनच खुणावणारा किल्ले रतनगड 
हा किल्ला सुमारे 2000 वर्षे जुना आहे. प्रवरा अर्थात अमृतवाहिणी नदीचा उगम  किल्ल्यावर होतो रतनवाडी गावामधून या किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. प्रवरा नदीच्या प्रवाहाच्या कडेने ही वाट जाते. साम्रद गावातूनही एक मार्ग आहे. आम्ही रतनवाडीच्या वाटेने चढाई केली. साधारण ३ कि.मी. चालल्यानंतर तुम्ही रतनगडाच्या पायथ्याजवळ पोहोचतात. तरीही अजून दाट झाडीतून, कारवीच्या झुडूपांतून जाणारी पायवाट लांबच लांब वाढत चाललीय असे वाटते. खुट्याच्या डोंगराचा सुळका व रतनगडाचे शिखर तेव्हडे दिसते.

 
दाट झाडीतून चालताना मध्येच पाऊस, वादळाने उन्मळून पडलेले मोठे वृक्ष वाट अडवितात.
वाट अडविणारी कोसळलेली झाडे..!
 
त्यांच्या खोडा खालून किंवा वरून जावून पुढे मार्गक्रमण करत राहावे. वाट दाट झाडीची असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही व चढाईही रमणीय होते. थकवा जाणवत नाही. कुठे कुठे चढण आव्हानात्मक, दमछाक करणारी आहे. शेवटच्या टप्प्यात लोखंडी शिड्यांवरून चढून जावे लागते. थोडं जपून जावे. मग लागतो गणेश दरवाजा. यातून आत गेल्यावर उजव्याबाजूला काही गुहा आहेत. एका गुहेत रत्नाईदेवीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये मुक्काम करता येतो. गुहांमधून प्रवरा नदी, रतनवाडी व भंडारदरा धरणाचा अथांग सागर यांचे मनोरम दर्शन होते. 
गुहेच्या 'डोळ्यातून' दिसणारा रतनवाडीचा परिसर 
                         हनुमान दरवाजातून पुढे आपण गडावर येवून पोहोचतो. या दोन्ही दरवाजांवर गणेश, हनुमान व इतर काही देवतांची शिल्पे व सुंदर नक्षीकाम मनोवेधक आहे. शत्रूंपासून वाचण्यासाठी किल्ला भक्कम करतानाच सौंदर्यदृष्टी जोपासण्याची तात्कालीन लोकांची  कलात्मकदृष्टीही वाखाणण्याजोगी आहे. जानेवारीचा महिना असल्याने रानफुलांचा हंगाम संपलेला असला तरी काही रानफुले लक्षवेधून घेत होती. किल्ल्यावर टेहळणीसाठी बांधलेली  एक गोलाकार वास्तू तग धरून आहे. या वास्तुस 'राणीचा हुडा' म्हणून ओळखतात. 
राणीचा हुडा 
येथून आजूबाजूस पाहिल्यावर बराच मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या वास्तुस भेट देवून उजव्या बाजूने उंच वाढलेल्या गवतातून जाणारी पायवाट 'नेढ्याकडे' घेवून जाते. 'नेढे' म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्यासाठी असणारे छिद्र ! ही एक नैसर्गिक रचना आहे. यातून पलीकडे जाता येते. तत्पूर्वी पश्चिमेला असलेले त्र्यंबक व कल्याण दरवाजे पाहून घ्यावे. हे दरवाजे म्हणजे किल्ल्याची प्रमुख प्रवेशद्वारे आहेत. ही प्रवेशद्वारे व कातळात कोरलेली वाट पाहून या किल्ल्याच्या भक्कमतेची  साक्ष पटते. पूर्वीची सुरक्षा यंत्रणा पाहता शत्रूस या वाटेने किल्ल्यात प्रवेश करणे अशक्य होते. हे प्रवेशद्वार व मार्ग म्हणजे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होय. 
या दरवाजांना भेट देवून नेढ्याकडे वाटचाल करण्यापूर्वी एक वैशिष्टयपूर्ण डोंगर; ज्याला 'खुटा' म्हणतात (जो आपले प्रथम पासूनच लक्ष वेधून घेत असतो) त्याची छायाचित्रे घेण्याचा मोह होतोच. 
नेढे 
नेढ्याची वाट थोडी चढण्यास अवघड वाटते कारण ती मातीची असल्याने निसरडी आहे. ही वाट चढून नेढ्यातून पलीकडे जाताना खूप भारी वाटते. आता आपण पश्चिम बाजूला येतो या बाजूने पाण्याची अनेक टाके दिसतात. गुहेतील पाण्याचे टाके पण आहे. या वाटेने हरीश्चन्द्राच्या डोंगररांगांचे राकट दर्शन व काळजात धस्स करणारी कोकणकड्याची खोली अनुभवता येते. संपूर्ण किल्ल्याला फेरी पूर्ण होवून आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतो. खूपच अविस्मरणीय आठवण ठरते ही रतनगडाची सफर! 



अमृतेश्वर मंदिर-
पुष्करिणी 
           रतनवाडी गावातील प्राचीन शिवालय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर दहाव्या-अकराव्या शतकातील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर पुष्करिणी आहे. 
            मंदिरावरील कोरीवकाम खूपच सुंदर आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे बाहेरील बाजू झिजलेली असली तरी नक्षीकामाच्या सुंदरतेची कल्पना येते. आतील सभामंडप अजूनही बराचसा सुस्थितीत आहे. देवादिक, यक्ष-गंधर्व, नृत्यांगनांची सुंदर शिल्पे खांबांवर व भिंतींवर कोरलेली आहे. काही कामशिल्पेही आहेत. गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्यात असते. सूर्यास्तावेळी या मंदिराचे सौंदर्य पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो!
अमृतेश्वर मंदिर 
काही क्षणचित्रे:-
किल्ल्यावरील प्रवेशद्वारे 
मुख्य प्रवेशद्वार  
गणेश दरवाजा 
हनुमान दरवाजा 
दरवाजांवरील देवादिकांच्या प्रतिमा खूपच सुरेख आहेत. गणेश, रिद्धीसिद्धी, हनुमान इ. 


खुटा:- रतनगडाच्या चढाईत हा 'खुटा' सतत लक्षवेधून घेत असतो. 

 'खुटा'  








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा